ठाणे : राबोडी येथील सरस्वती स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संस्थेत तिसरीत शिकणारी विद्यार्थिनी कार्तिकी चव्हाण हिने आपल्याला खाऊसाठी, तसेच बक्षीस म्हणून मिळालेल्या पैशांतून कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना दोन हजार रुपये मदत केली.
कार्तिकीचे वडील प्रा. किरणकुमार चव्हाण हे कल्याणमधील मराठी नाट्य मंडळात पूरग्रस्तांसाठी जमा केलेल्या साहित्याचे पॅकिंग करण्यासाठी गेले होते. ते पाहून आपणही मदत करू शकतो असा विचार कार्तिकीच्या मनात आला. न्यूज चॅनलवरील मदतीच्या बातम्या पाहून त्यांना मदत करावी, असे आपल्याला वाटल्याचे तिने सांगितले.
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन तिने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पैसे जमा करण्यासाठी धनादेश सुपुर्द केला. ‘एवढ्या लहान वयात असे विचार मनात येणे हे कौतुकास्पद आहे,’ अशा शब्दांत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तिचे कौतुक केले. कार्तिकीचे वडील ठाण्यातील न्यू गर्ल्स स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या संस्थेत समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत.